घोडबंदर परिसरातील काही प्रमाणात होणार पाणी टंचाई दूर !
ठाणे 20 ठाणे शहराच्या घोडबंदर परिसरातील वाढते नागरीकरण तसेच उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर प्रभावी उपाय म्हणून आनंद नगर, ठा. म. पा उद्यान, कासारवडवली व कृष्णा ग्रीनलँड पार्क, कासारवडवली या परिसरातील 3 जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून, त्यावर आर.ओ. प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून आज रोजी त्याचा पाहणी दौरा करण्यात आला.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजविण्यात आल्या किंवा कचरा व सांडपाण्यामुळे दूषित झाल्या. परिणामी, नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाणे व मिरा-भाईंदर शहरांतील ४६ विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि संरक्षक उपाययोजना करून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे काम सुरू आहे. तसेच, या विहिरींवर आर.ओ. प्लांट बसविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणांमुळे तो खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत पुनर्जीवित विहिरी आणि त्यावर बसविण्यात आलेले आर.ओ. प्लांट नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत.
या प्रकल्पांतर्गत विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जात असून, सांडपाणी मिसळण्यास प्रतिबंध केला जात आहे. विहिरींच्या संरक्षणासाठी जाळ्या बसविणे, भिंतींचे मजबुतीकरण करणे तसेच नियमित स्वच्छता राखणे अशा उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे विहिरींतील पाणी शुद्ध आणि सुरक्षित राहणार आहे.
या उपक्रमामुळे एप्रिल-मे महिन्यांत भासणारी तीव्र पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना वर्षभर शुद्ध पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणारा हा विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम आदर्श ठरत असून, राज्यातील इतर शहरांतही अशा उपक्रमांची अंमलबजावणी व्हावी, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
या पाहणी दौऱ्याला उपशहरप्रमुख साजन कासार, राजेंद्र पाटील, कृष्णा भोईर, विभागप्रमुख भगवान देवकते यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
