Monday, December 22 2025 2:05 pm
latest

राष्ट्रपतींनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. गोऱ्हे आणि विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी घेतली राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मु यांची भेट

दिल्ली 7: आज मा. महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना दिले. या निमंत्रणाचा तात्काळ स्वीकार राष्ट्रपतींनी केला असून या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सोमवार दिनांक ६ आणि ७ नोव्हेंबर,२०२३ असे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मु यांची भेट घेतली.

महाराष्ट्र विधान परिषदेला २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. १९१९ च्या भारतीय कायद्यानुसार १९२१ मध्ये भारतातील पहिली विधान परिषद मुंबई प्रांतात स्थापन झाली. याचे पहिले सभापती म्हणून श्री. चंदावरकर यांची नेमणूक करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी २०२१ हे शतक महोत्सवी वर्ष होते. २०२१ मध्ये कोरोना सारखा गंभीर आजार असल्याने कोणताही कार्यक्रम आयोजित करता आला नाही. त्यामुळे यावर्षी विधान परिषदेचा शतक महोत्सव साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण महामहीम राष्ट्रपती यांना आज देण्यात आले.

या शतक महोत्सवी कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून दिनांक ०८ नोव्हेंबर,२०२३ रोजी सकाळी ११.३० वा विधान परिषदेच्या जुन्या सदस्यांसाठी व नवीन सदस्यांसाठी एक दिवसाची पूर्व तयारीची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर व पर्यटन मंत्री श्री मंगल प्रसाद लोढा हे उपस्थितीत राहणार आहेत.

या कार्यक्रमाला जवळपास १०० माजी सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच विधानपरिषदेतील कामकाजासंदर्भात विविध विषयावर ५ पुस्तके करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी विधान परिषद मध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या जेष्ठ पत्रकार यांच्या ५ समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत असे डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.