Wednesday, June 24 2026 11:30 am

महाराष्ट्रातील पहिल्या ‘राज्यगीत’ शिल्पाचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते अनावरण

मुंबई 26 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते राज्यगीत शिल्पाचे अनावरण करण्यात आले.

महाराष्ट्राचे राज्यगीत या शिल्पावर कोरले असून, महाराष्ट्रात असे शिल्प प्रथमच उभारण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे शिल्प स्थापित करण्यात आले आहे.

आपल्या राज्यगीताला एक सुवर्ण इतिहास आहे, महाराष्ट्राविषयी अभिमान जागवण्याची ताकद या सुरांमध्ये आहे, आणि आपल्या राज्याची महती सांगणारे हे शब्द प्रत्येकाच्या मनात वर्षानुवर्षे घर करून आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शिल्पाची स्थापना करण्याचा मुख्य उद्देश नागरिकांना महाराष्ट्राच्या गौरवाची सतत आठवण करून देण्याचा असल्याचे पालकमंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वाटेवर हे गीत प्रेरणेचा स्रोत म्हणून सोबत राहील असा विश्वास पालकमंत्री लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.

दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी क्रांतिदिनीमित्त पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुख्यद्वारापाशी 75 फुटी राष्ट्रध्वज स्तंभाचे अनावरण करण्यात आले. जेणेकरून मुंबई उपनगर परिसरात येताना प्रत्येकाला आपला ध्वज दिसेल आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण राहील. त्याचप्रमाणे आता जिल्हाधिकारी कार्यालयात निर्माण करण्यात आलेल्या या शिल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या, बलिदान देणाऱ्या विभूतींची आठवण सदैव आपल्या सोबत राहील. देशाचा अभिमान आणि राज्याचा गौरव जपण्यासाठी मुंबई उपनगरात पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून, विविध प्रयत्न केले गेले आहेत आणि करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत यावेळी देण्यात आली.