Saturday, March 7 2026 6:36 pm

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या ध्येयाकडे नेणारा दूरदृष्टीचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प – मंत्री मकरंद जाधव – पाटील

मुंबई, 07 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला 2026-27 चा अर्थसंकल्प हा “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाकडे नेणारा दूरदृष्टीचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिली.

मंत्री मकरंद जाधव – पाटील म्हणाले की, या अर्थसंकल्पातून शेती, उद्योग, सेवा क्षेत्र आणि पर्यटन या महत्त्वाच्या क्षेत्रांना चालना देत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडण्यात आला आहे.

मंत्री मकरंद जाधव – पाटील म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ध्येय धोरणांना पुढे नेणारा हा संकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, ग्रामीण भाग, पायाभूत सुविधा, उद्योग आणि रोजगार निर्मिती यांना प्राधान्य देणाऱ्या विविध योजनांमुळे राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळणार आहे. विशेषतः नैसर्गिक शेती अभियान, ग्रामीण रस्ते विकास, उद्योग गुंतवणूक धोरण आणि पर्यटन विकास यांसारख्या निर्णयांमुळे राज्यातील सर्व घटकांचा विकास साधला जाणार आहे.

तसेच मदत व पुनर्वसन आणि ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा अर्थसंकल्प प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित असून राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल असेही मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी नमूद केले