Monday, February 16 2026 8:53 pm

स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने भारत विश्वगुरू होणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई  १६ : स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत नक्कीच विश्वगुरू होणार असल्याचा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. उद्योग समूह आणि लघु उद्योगांना लाभदायक ठरणाऱ्या देशातील पहिल्या ‘ए आय  लिव्हिंग लॅब’ चा महाराष्ट्रात शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. मंत्री लोढा यांच्या हस्ते व जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लर यांच्या उपस्थितीमध्ये या लॅबचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात करण्यात आले. जर्मनीच्या सहकार्याने रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा हा अभिनव उपक्रम आहे.

जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, जर्मनीचे वाणिज्यदूत क्रिस्टॉप हेलिर, जीआयझेडचे संचालक उल्करे एबेलींग, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यांच्या उपस्थित रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या  (आरटी-एमएसएसयू) सेंट्रल हॉल येथे ‘लिव्हिंग लॅब’शी संबंधित विविध सामंजस्य करारही करण्यात आले आहेत.

मंत्री लोढा  म्हणाले की, प्राचीन भारतात आपल्या उद्योगात तत्कालीन प्रगत तंत्रज्ञान वापरात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. छोट्या छोट्या उद्योगांच्या जोरावरच भारत त्या काळी  एक समृद्ध राष्ट्र म्हणून जगभरात व्यापार करत असे. स्वदेशीच्या संकल्पनेवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना आपत्तीत जगभरातल्या ७५ पेक्षा अधिक देशांना स्वदेशी लस देऊन वैश्विक मैत्रीची भूमिका घेतली. यावर ते थांबले नाहीत तर अधिक अद्ययावत तंत्रज्ञान भारतात आणून स्वदेशी उद्योगांना चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर्मनीच्या सहकार्याने सुरु होत असलेला ‘ ए आय  लिव्हिंग लॅब’   हे त्याचेच द्योतक असून स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत नक्कीच विश्वगुरू होणार असल्याचे मंत्री लोढा यांनी म्हटले.

विकासाच्या दूरदृष्टीतून राज्याला प्रगतीच्या शिखरावर पोहचवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. फडणवीस यांच्याच मार्गदर्शनात कौशल्य विभागाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात असून तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लर  म्हणाल्या की, मानवजातीच्या भविष्याला आकार देण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय ) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपण सर्वजण मिळून याचा योग्य वापर केला, तर विज्ञानातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवणे, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी दूर करणे शक्य होईल.उद्योग क्षेत्रात  एआयमुळे मोठे बदल घडत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि संस्था परस्पर सहकार्य करून नवीन संशोधन आणि नवकल्पना राबवत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून, लाखो व्यावसायिक आणि तज्ज्ञ यामध्ये कार्यरत आहे.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता एक प्रकारची औद्योगिक क्रांतीच आहे, जी केवळ पर्यायी नाही तर जगभरात अत्यावश्यक बनत आहे. अर्थव्यवस्थेची रचना आणि काम करण्याच्या पद्धती यात मूलभूत बदल होत आहेत. नवीन पिढी एआयचा प्रभाव अधिक वेगाने स्वीकारत असून आणि त्यात मोठ्या संधी पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर यांनी  ‘एआय लिव्हिंग लॅब’ चे पैलू उलगडून दाखवले. हा उपक्रम जर्मनी आणि भारत यांच्यातील कौशल्य विकास व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करणार आहे. उद्योग, विद्यापीठे आणि शासन यांना एकत्र आणून प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे.

‘लिव्हिंग लॅब’ ही संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील  आव्हाने लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना सुचविणार आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि उद्योग तज्ज्ञ एकत्र येऊन अडचणींचे निदान करू शकतात , त्यांचे विश्लेषण करतात आणि व्यवहार्य उपाय सुचविण्याची कुशलताही यामुळे वाढीस लागून देशभरातील उद्योगांना याचा लाभ होणार असल्याचे पालकर यांनी स्पष्ट केले. सध्या जर्मनीच्या सहकार्याने तिथल्या पाच कंपन्या या लॅबला सहकार्य करणार आहेत. त्यातून तंत्रज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे. जर्मनीतल्या लिपझिक विद्यापीठ, स्टेप कॉम्पिटन्स आणि महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआय  लिव्हिंग लॅब’ उपक्रम राबवण्यात येत असून महाराष्ट्रातील अक्युरेट इंडस्ट्रियल कंट्रोल्स लिमिटेड, लाईटेक्स इलेक्ट्रिकल, अश्विनी मॅग्नेटस आणि पीएमटी मशीन या कंपन्यांनी रतन टाटा विद्यापीठासोबत सहकार्य करण्याचा करार केला आहे. या उपक्रमातून विविध उद्योग क्षेत्रातील अडचणींवर एआय तंत्रज्ञानाद्वारे उपाययोजना आणि पुढील आवश्यक नियोजन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.