ठाण्यात प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूल बेकायदेशीर पणे सुरू,
मनसेचे संदीप पाचंगे आक्रमक
ठाणे, १४ – ठाण्यातील कासारवडवलीतील सेक्टर ६ मध्ये सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्टने बेकायदेशीरपणे शाळा सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वापर परवाना नसतानाही शाळेतील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे भविष्य व सुरक्षितता धोक्यात आणले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओवळा-माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. या प्रकरणी ट्रस्टच्या विश्वस्तांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्टला ठाणे महानगरपालिकेने २०१८ मध्ये ५६८४ चौ.मी.चा भूखंड ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर शाळा उभारण्यासाठी दिला होता. महासभेतील ठराव आणि रेडी रेकनर २०१८ च्या दराप्रमाणे हा भूखंड देण्यात आला. ३१ मार्च २०१८ रोजी ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सहमतीने भाडेपट्टा करारनामा नोंदणीकृत करण्यात आला. या करारनाम्यात महानगरपालिकेने काही अटी व शर्ती घातल्या होत्या. ट्रस्टने शाळेचे बांधकाम पूर्ण केले असले तरी, अद्याप ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडून वापर परवाना (भोगवटा प्रमाणपत्र) मिळालेला नाही. इमारतीची सुरक्षितता सुनिश्चित करणारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. न्यायालयानेही अशाच प्रकारच्या एका प्रकरणात भोगवटा प्रमाणपत्र महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले आहे. मात्र, सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्टने हे नियम धाब्यावर बसवत विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शाळा सुरू केली आहे. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारत असून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप संदीप पाचंगे यांनी केला आहे.
या भूखंडाबाबत शासनाकडून अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. तत्कालीन आयुक्त बिपिन शर्मा यांनी या संदर्भात प्रधान सचिव, नगर विकास विभाग यांना पत्र लिहिले होते. मात्र, अद्याप शासनाकडून कोणतीही मंजुरी मिळालेली नाही. यामुळे ट्रस्टला या भूखंडावर बांधकाम करण्याचा किंवा वापर करण्याचा अधिकारच नाही.आता हा शाळेचा भूखंड नाममात्र दरात ९९ वर्षांकरिता मिळावा यासाठी ट्रस्टने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १४ जून २०२४ रोजी पत्र लिहिले आहे. या पत्राच्या आधारे ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, ट्रस्टची ही मागणी शासनाच्या धोरणाशी विसंगत असल्याचे पाचंगे यांनी म्हटले आहे. ट्रस्ट शासनाची दिशाभूल करून हा भूखंड नाममात्र दरात हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ट्रस्टने प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यात आले आहे.
