Sunday, May 10 2026 6:14 am

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, 01 : ऊसतोड कामगारांच्या मुलांचा शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. याबाबत जिल्हा पातळीवर होणाऱ्या कार्यवाही संदर्भात तातडीने बैठक घेऊन आढावा घेण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या समस्यांबाबत लवकरच आढावा घेणार असल्याचे सांगितले.

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या साखरशाळा आणि आरोग्य याविषयी बुधवारी विधान परिषदेत पुरवण्या मागण्यांवर चर्चेदरम्यान सदस्य सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. साखर कारखाना मालक साखर शाळांबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे आपल्या पालकांबरोबर स्थलांतर करणारे विद्यार्थी शाळाबाह्य होतात. परिणामी भविष्यात ही मुले ऊसतोडीकडे वळतात. यामुळे या समस्या सोडविण्यासंदर्भात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सूचना केल्या.