Saturday, February 14 2026 5:20 pm

सांगली जिल्ह्यात ‘मनरेगा’ची प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, 14 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू हातांना काम द्यावे आणि त्यातून दर्जेदार कामे करावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित ‘मनरेगा’ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी योजनेच्या सद्यस्थितीचा आणि भविष्यातील नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, उपवनसंरक्षक सागर गवते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, जत उपविभागीय अधिकारी अजय नष्टे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात कायद्यानुसार विहित केलेल्या कालावधीसाठी अकुशल रोजगाराची मागणीनुसार उपलब्धता करून देणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने रोजगार हमी योजनेतून प्रत्येक गावात वृक्ष लागवड, जलतारा, बांबू लागवड आदि कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. तसेच, प्रत्येक गावामध्ये अकुशलप्रधान कामे हाती घ्यावीत. प्रत्येक गावामध्ये पाच किलोमीटर रस्त्याची कामे रोजगार हमी योजनेतून करावीत, जिल्ह्यामध्ये सर्व यंत्रणांनी नरेगाची कामे घ्यावीत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत करावयाच्या कामांच्या अनुषंगाने मत मांडले. रोजगार हमी योजनेंतर्गत होणारी विविध कामे केवळ ठराविक ठिकाणी न राहता, ती प्रत्येक गावात पोहोचण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांचा, मजुरांच्या उपस्थितीचा आणि आतापर्यंत पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा सादरीकरणाद्वारे सादर केला.