मुंबई, 07 : विकासाची दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प म्हणजे विकासाचा रोडमॅप आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित राष्ट्राच्या संकल्पनेच्या कक्षेत महाराष्ट्राचे आर्थिक योगदान स्पष्ट करणारा हा अर्थसंकल्प आहे. औद्योगिक प्रगतीसह रोजगाराभिमुख असा अर्थसंकल्प सादर करून मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रगतीची घोडदौड सुरुच ठेवली आहे. अशी प्रतिक्रीया कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे.
मंत्री लोढा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कौशल्य, रोजगार, उद्योजकता अणि नाविन्यता विभागाला ही नव ऊर्जा दिली आहे. विभागाच्या दक्ष उपक्रमांतर्गत तरुणांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिमा या संस्थेची स्थापना केली जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्याने देशाचे स्टार्टअप कॅपिटल म्हणून आपले स्थान कायम राखल्याचा अत्यधिक आनंद आहे.
मुख्यमंत्री महाफंड योजनेंतर्गत १.२५ लाख उद्योजक आणि ५० हजार स्टार्टअप्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून, निवडक स्टार्टअप्सना राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
या योजनेंतर्गत निवडलेल्या ५० स्टार्टअप्सना निविदा प्रक्रिया न करता थेट ₹२५ लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यातून नव्या स्टार्टअप्सचा पाया भक्कम होणार असून मुख्यमंत्र्यांनी तरुणांमध्ये नवी उमेद निर्माण केली आहे.
“भारत इनोव्हेशन, रिसर्च, स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता (बीआयआरएसए)” हा उपक्रम सुरू करून आदिवासी समाजात उद्योजकतेला चालना दिली जाणार आहे.
वांद्रे येथे बहुउदेशीय चर्मकार संस्था स्थापन करून जागतिक दर्जाचे कुशल चर्म कारागीर आणि लेदर क्राफ्ट कौशल्य विकसित केले जाणार असून भारतीय कलेला जागतिक बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे. केवल कौशल्य विभागच नाही तर सर्वसमावेशक समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेणारा अणि राज्याला आर्थिक शिस्त लावणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
