मुंबई 11 : महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांना आळा घालून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी शासन ठोस पावले उचलत आहे. कायदा आणि सुरक्षेसाठी शासनातर्फे शाळा, महाविद्यालये , ग्रामीण व शहरी भागात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यातील बालकांवरील अत्याचारामध्ये वाढ झाल्याबाबत आमदार सुहास बाबर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यमंत्री कदम म्हणाले की, राज्यात बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेली सर्व कार्यवाही लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात येईल. मुंबई, पुणे यांसारख्या महानगरपालिका क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयांसह ग्रामीण भागातही मुला-मुलींसाठी ‘गुड टच-बॅड टच’ विषयी विशेष अभियान राबवले जात आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या अंतर्गत आतापर्यंत सुमारे ६१ हजार शाळांना भेटी देवून जनजागृती करण्यात येत आहे. मारहाणींच्या प्रकरणांमध्ये एकमेकांवर दबाव आणण्यासाठी महिला अत्याचार कायद्याचा वापर केला जातो याला देखील आळा घालण्यासाठी गृह विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.
