Sunday, June 21 2026 4:41 am
latest

तारळी धरण प्रकल्पग्रस्तांच्या नागरी सुविधांची कामे गतीने करावीत – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, 06 : तारळी धरण प्रकल्पग्रस्तांच्या नागरी सुविधा तसेच पुनर्वसनाच्या अनुषंगाने कामे गतीने करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिले.

मंत्रालयात तारळी प्रकल्पग्रस्तांच्या आढावा बैठकीत मंत्री जाधव- पाटील बोलत होते. या बैठकीला सातारा जिल्ह्याचे पुनर्वसन अधिकारी मनोहर गायकवाड, तारळीच्या कार्यकारी अभियंता श्रध्दा सुदेवाड, वन विभागाचे अधिकारी, श्र.मु.द.समतावारी संघटनेचे डॉ.प्रशांत पन्हाळकर, तारळी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले की, तारळी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या समस्या सर्व संबंधित विभागाने तातडीने सोडवाव्यात. गावठाणांचे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्याची कार्यवाही गतीने करण्यात यावी. पुनर्वसित गावठाणांमध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव त्रुटी दूर करून तातडीने सादर करावा. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित कामांसाठी सर्व विभागांनी समन्वयानी आणि गतीने कार्यवाही करावी.