Saturday, March 7 2026 4:57 pm

ग्रामीण विकासाला बळ देणारा अर्थसंकल्प -मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, 08 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, महिला व ग्रामीण विकासाला बळ मिळणार असल्याचे मत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

2027 पर्यंत ग्रामीण भागातील विहित मानकानुसार पाणी उपलब्ध करण्यात राज्य जल माहिती केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. बारामती पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रणव भागातील क्षेत्रात पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरता निरा कऱ्हा नदीजोड प्रकल्प राबवण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याची अर्थव्यवस्था सध्या देशातील सर्वात गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. ती 7.9 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्मार्ट शेती आणि सर्वसमावेशक विकासावर भर देत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या शिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द दिला होता. तो आज पूर्ण केला आहे.

सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर झाल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी 30 लाख शेतकऱ्यांना महाविस्तार या एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतीविषयक सर्व तांत्रिक आणि बाजारपेठेतील माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांच्यासाठी वसुधा ही विशेष मेसेज सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे शासकीय योजनांची माहिती थेट त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत आता शेतमजुरांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योग योजना ही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुरू केली जाणार आहे.

महिला शेतकऱ्यांच्या उद्योजकतेसाठी विशेष कार्यक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. एकूणच शेतकरी, महिला व ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रीत असलेला हा अर्थसंकल्प आहे. अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.