मुंबई, 11 : जलजीवन मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार,भातकुली पाणीपुरवठा योजनेचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य राजेश वानखडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार, भातकुली अमरावती तालुक्यातील 105 गावे वाढीव पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 39 गावे खारपाण पट्ट्यातील आहेत. सद्यस्थितीत मूळ योजनेमधून 81 गावांना 40 लिटर प्रमाणे पाणीपुरवठा होत आहे. उर्वरित 24 गावांच्या योजनेमधून पाण्याची मागणी नसल्याने त्यांना ग्रामपंचायतीमार्फत पाणी पुरवठा सुरू आहे. सुधारित प्रस्तावामध्ये ही 24 गावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, योजनेसाठी नियोजित जागा उपलब्ध न झाल्यामुळे कामास सुरुवात करण्यात काही प्रमाणात विलंब झाला. तथापि, जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून स्वतःच्या निधीतून आर्थिक तरतूद केली आहे. राज्य शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 4 हजार कोटी रुपये स्वनिधीतून उपलब्ध करून दिले आहेत. केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होताच उर्वरित निधी देण्यात येईल.निधी प्राप्त होताच ही योजना डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, अशी माहितीही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
