Monday, March 9 2026 10:51 pm

राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविणार

मुंबई,15 : राज्यात राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण सेवा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये ही सेवा योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीद्वारे रुजवावे या उद्देशाने राज्यात पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येते. सुरुवातीस राज्यातील १२ जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येत होती. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील पाच वर्षांत राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे.

स्थानिक पर्यावरणाशी निगडित समस्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभाग व कृती समजून घेऊन त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी प्रोत्साहन देणे, निसर्ग व मानव यांचे नाते बालवयात बिंबवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

राज्यातील महानगरपालिका, नगर पालिका, नगर परिषद, ग्राम पंचायत क्षेत्रातील इच्छुक शाळा यासाठी अर्ज करू शकतात. ही योजना राबवण्यासाठी ५ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.