Wednesday, July 15 2026 2:48 am

ठाण्यातील सर्व वृक्षांचे हेल्थ ऑडिट करा; आमदार निरंजन डावखरेंची आयुक्तांकडे मागणी

ठाणे 14 – ठाणे शहरात पावसाळ्यात वृक्ष कोसळून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व वृक्षांचे तातडीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देत धोकादायक वृक्षांची वैज्ञानिक तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणे, फांद्या तुटणे तसेच त्यातून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. शहरातील सर्व वृक्षांचे तातडीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले. शाळा, रुग्णालये, बसस्थानके, रेल्वे स्थानके, मुख्य रस्ते, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणांवरील वृक्षांना प्राधान्य देऊन हे ऑडिट करण्यात यावे. तसेच ही मोहीम केवळ एकदाच न राबविता दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नियमितपणे राबविण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या जीविताचे संरक्षण आणि भविष्यात वृक्ष कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या भेटीनंतर आमदार डावखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अनेक वृक्ष बाहेरून हिरवेगार आणि सुरक्षित दिसत असले तरी आतून ते पोकळ, रोगग्रस्त किंवा कमकुवत झालेले असतात. अशा वृक्षांची वेळेत तपासणी न झाल्यास वादळी वारे किंवा मुसळधार पावसात ते कोसळून मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वृक्षतोड हा एकमेव पर्याय नसून प्रत्येक वृक्षाची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेने तज्ज्ञांच्या माध्यमातून शहरातील सर्व मोठ्या वृक्षांचे हेल्थ ऑडिट करून त्यामध्ये वृक्षांची मुळे, खोडाची मजबुती, रोगग्रस्त स्थिती, फांद्यांचा भार आणि कोसळण्याचा संभाव्य धोका यांचे परीक्षण करावे. त्यानुसार धोकादायक वृक्षांवर छाटणी, उपचार किंवा आवश्यक असल्यास नियमानुसार हटविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आयुक्त राव यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.