Wednesday, August 26 2026 9:32 am

उमरझरी येथील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राणी-मानव संघर्ष रोखण्यासाठी अभयारण्यांची उभारणी करणार – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, 30 : उमरझरी (ता. साकोली, जि. भंडारा) येथील महिलेवर वाघिणीने हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात वाढती वाघ व बिबट्यांची संख्या लक्षात घेऊन मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत दिली.

उमरझरी (ता. साकोली, जि. भंडारा) येथील महिलेवर वाघिणीने हल्ला केल्याबाबत सदस्य निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला.

वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, राज्यात वाघ आणि बिबट्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून प्रत्येक जिल्ह्यात, विशेषतः कोकणात, संरक्षित अभयारण्य उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 10 हजार एकर क्षेत्रात कुंपणयुक्त अभयारण्य उभारण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यामध्ये शाकाहारी प्राण्यांसाठी आवश्यक अधिवास निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले मांसाहारी प्राणीही जंगलातच राहतील आणि मानवी वस्त्यांकडे त्यांचा वावर कमी होण्यास मदत होईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.