Thursday, February 5 2026 4:26 pm

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, 05 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतिवीर राजे उमाजी नाईक या पुरस्कारांसाठी सन २०२५-२६ वर्षाकरिता इच्छुक व्यक्ती व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी व्यक्ती व संस्थांनी २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन सहसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय यांनी केले आहे.

पुरस्कारासाठी अटी व शर्ती :- अर्जदार व्यक्ती, संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

पुरस्कारासाठीचे अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग येथे २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना, शासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच अधिक माहिती सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जिल्हा कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.

पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.