Wednesday, February 4 2026 7:28 am

विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची साश्रू नयनांनी श्रद्धांजली

ठाणे, 29: “आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली.

बारामतीजवळ विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावरून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.अपघाताची बातमी मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांच्याशी असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.

“आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं. अजित पवार पहाटेपासून कामाला लागायचे. सकाळी सहा वाजताही त्यांनी आदेश दिल्याचे मी स्वतः पाहिले आहेत. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच ते बोलायचे. रोखठोक स्वभाव असला, तरी मनाने ते अत्यंत निर्मळ होते,” असं शिंदे यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळात जेव्हा राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा व्हायची, तेव्हा अजित पवार नेहमीच वास्तव मांडायचे आणि योग्य दिशा सुचवायचे. “त्यांचा अनुभव, अभ्यास आणि प्रशासनावरील पकड आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरायची,” असंही त्यांनी नमूद केलं.

काल-परवाच एका कार्यक्रमात त्यांची भेट झाल्याची आठवण सांगताना शिंदे भावूक झाले.
“आज त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबाचंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. मी त्यांना मनापासून आदरांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक निर्भीड, धडाडीचा आणि अनुभवी नेता गमावला असून, त्यांच्या कार्याची आठवण कायम जनतेच्या मनात राहील.