Sunday, March 22 2026 11:30 pm

मुक्ताईनगर येथील माझी वसुंधरा अभियानातील कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू- खनिकर्म मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, 12 : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील तत्कालीन मुख्याधिकारी यांनी ‘माझी वसुंधरा अभियान’ मध्ये गैरव्यवहार केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर तीनच आठवड्यात या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून सध्या याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती खनिकर्म मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य एकनाथ खडसे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

खनिकर्म मंत्री देसाई म्हणाले की, तक्रारीतील मुद्द्यांची सखोल तपासणी, स्थळ पाहणी, मोजमाप आणि अभियंत्यांकडून अहवाल प्राप्त करण्यासाठी निश्चित कालावधी आवश्यक आहे. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. चौकशी अहवालात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात शासकीय अभियंत्रिकी महाविद्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतली जात असून, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.