मुंबई 11:- शालेय शिक्षण हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शासनाच्या शाळा सुस्थितीत राहाव्यात यासाठी विविध मार्गांनी निधी उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात येत असून शाळा सुस्थितीत राहाव्यात यासाठी रोडमॅप तयार करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील शाळांच्या स्थितीबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.
शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, राज्यात 24 हजार 152 अनुदानित खासगी व्यवस्थापनाच्या शाळा असून यापैकी अनेक शाळा सुस्थितीत आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व शैक्षणिक तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे ही शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी असून त्याचा आढावा घेण्यात येईल. पवित्र प्रणालीमार्फत भरती प्रक्रिया सतत सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) चा निधी लवकर देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.
