Sunday, December 21 2025 11:07 pm
latest

सीआयआयच्या ‘आंतरराष्ट्रीय शिखर परिषदे’मध्ये राज्याच्या प्रगतीचा आढावा

मुंबई, 17 : महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन असून, राज्याने परकीय थेट गुंतवणूक, वित्तीय सेवा, फिनटेक, उत्पादन, पायाभूत सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर्स, स्वच्छ ऊर्जा यांसारख्या नव्या क्षेत्रांत आघाडी घेतली आहे. काही राज्ये सवलतींमुळे गुंतवणूक आकर्षित करतात, महाराष्ट्र विश्वासामुळे गुंतवणूक खेचतो आहे. असा आढावा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) यांच्या वतीने आयोजित मुंबई आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत महाराष्ट्राच्या औद्योगिक, गुंतवणूक आणि डिजिटल प्रगतीचा आढावा मांडण्यात आला. या परिषदेला शासन, उद्योग, व्यापार आदि क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मान्यवर उपस्थित होते.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, CII मुंबई आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे अध्यक्ष वैभव वोहरा, ब्रिटिश उप उच्चायुक्त हरजिंदर सिंग कांग, ब्राझील वाणिज्यदूतावासाचे महावाणिज्यदूत जोसे माउरो दा फोन्सेका कोस्टा काउतो, CII वेस्टर्न रिजनचे अध्यक्ष ऋषी कुमार बागला, CII वेस्टर्न रिजनचे उपाध्यक्ष वीर अडवाणी, CII चे सह-अध्यक्ष अनुराग अगरवाल आदी उपस्थित होते. परिषदेला विविध क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रतिनीधी उपस्थित होते.

आर्थिक, पायाभूत, डिजिटल तसेच विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या अफाट संधीबाबत यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.