पुराव्यासह तक्रारी करून देखील आयोग गंभीर नाही
निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांची खाजगी यंत्रणा – शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे
बोगस मतदारांना रोखण्यात निवडणुक आयोगाला अपयश
ठाणे, 11 – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभेच्या पराभवानंतर आपल्या पराभवाची कारणे शोधली असता त्यावेळी असे निदर्शनास आले की, जनमत आपल्या बाजूने असताना कटकारस्थाने करून पैसा व सत्तेचा गैरवापर करून निवडणूक यंत्रणांमध्ये आपल्या मर्जीतल्या अधिकारांच्या नेमणुकांकरून सत्ताधारी आपली पोळी भाजून घेत असल्याचा गंभीर आरोप खा. विचारे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळासोबत काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत केला आहे.
त्यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, शहरप्रमुख उपशहर प्रमुख, सचिव व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोग वारंवार असे सांगते की, निवडणूक प्रक्रिया सपूर्ण पारदर्शकता आहे. परंतु ही पारदर्शकता ठाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून न आल्याने ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य तसेच निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी यांना दि. १८/०७/२०२४ व दि. १९/०७/२०२४ पत्राद्वारे लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील झालेल्या अपारदर्शकता संदर्भात पुरावेसहित पत्र दिले आहे .परंतु अद्यापही याचे लेखी उत्तर प्राप्त न झाल्याने पुन्हा स्मरण पत्र देऊन पत्रामध्ये नमूद केलेल्या लोकसभा निवडणुकीतील वस्तुस्थितीचा खुलासा सादर करावा अशी मागणी पुन्हा केली होती.
दिनांक १८/०७/२०२४ रोजी दिलेल्या पत्रातील मुद्दे
दि. ०२ मे २०२४ रोजी झालेल्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांकडून १७ सी अर्जावर नमूद केलेले मतदारांची संख्या व दि. ४ जून २०२४ रोजी निकालानंतर फॉर्म नंबर २० वर केलेल्या मतदारांची संख्या यामध्ये तफावत असल्याचे भासून आल्याने याचे स्पष्टीकरण द्यावे.
मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनच्या POLL. END. TIME. मध्ये दाखवण्यात आलेला टाईम हा ECI च्या निदर्शनाप्रमाणे संध्याकाळी सहा पर्यंत असणे आवश्यक असताना मशीन्स वेळेच्या आधी बंद झालेल्या आढळून आले आहेत. याचे स्पष्टीकरण द्यावे.
या EVM मशीन १२ तास वापरून सुद्धा 99% दाखवत होत्या याचे स्पष्टीकरण द्यावे.
मीरा-भाईंदर मधील ईव्हीएम द्वारे मतमोजणी झालेली आकडेवारी ही व्हीव्हीपॅट स्लीप यात तफावत आढळल्याचे निदर्शनास आले आहे याचे स्पष्टीकरण द्यावे.
दिनांक १९/०७/२०२४ रोजी दिलेल्या पत्रातील मुद्दे
दि. १९/०७/२०२४ रोजी निवडणूक आयोग व निवडणूक अधिकारी ठाणे यांना दिलेल्या पत्रामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघातील विधानसभासहित १४५, १४६, १४७, १४८, १५० व १५१ विधानसभा मतदार यादीतील दुबार नावांची आकडेवारी व या दुबार मतदारांनी दोन ते तीन वेळा केलेल्या मतदाराची पुरावे सहीत दिलेली आहे ती दुबार नावे वगळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वरील उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरणासाठी अधिकृत पुरावे निवडणूक विभागाकडे असल्याने याची पडताळणी करून त्यांनीच याचे स्पष्टीकरण देऊन शंका दूर करावी अशी मागणी भारत निवडणूक आयोग व ठाणे निवडणूक अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे परंतु याची दखल घेतली जात नसल्याने खासदार राजन विचारे यांनी सरकारी यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत.
सरकार हे बदलत असतात कोणी कायमस्वरूपी नसतात. ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांसारखी काम करून घेतली जात आहेत. लोकसभेला आम्ही सहन केले,विधानसभेला सहन केले जाणार नाही. तसेच कोणी कामे केलेली आहेत या सर्व लोकांची नावे आमच्याकडे आहेत वेळ आल्यास नक्की जाहीर करू, जर अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटत असाल तर रस्त्यावर उतरून काम करावे लागेल असाच इशारा शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे
बोगस मतदानाला प्रोत्साहन देऊ नका दोषीवर कार्यवाही करा
दुबार नावे वगळण्यासाठी वारंवार पत्र देवूनसुद्धा दि. ०६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये दुबार मतदारांचा आकडा पुन्हा वाढल्याने काल रात्री उशिरा दुबार नावांच्या मतदार याद्या जिल्हाधिकारी व सर्व निवडणूक अधिकाऱ्यांच्या समवेत त्यांना सुपूर्त केल्या.
नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेल्या बोगस मतदानाला आळा बसावा यासाठी येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन दुबार नावे वगळावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच एखाद्या यादीमधील अपरिचित व्यक्ती जी कोणी तेथे राहत नसतील तर त्यांना नोटीसा पाठवून त्यांचे नाव कोणत्या यादीमध्ये ठेवावे यावर तातडीने कार्यवाही करावी अशीही मागणी करण्यात आली. तसेच दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारूप प्रसिद्ध केलेली यादी ची फोटो सहित सॉफ्ट कॉपी दिल्यास यातील पुन्हा दुबार नावे शोधण्यास BLA यांना व इतर नागरिकांना ही ओळखणे सोपे जाईल. तसेच वगळण्यात येणारी नावे पुन्हा नोदाविण्यास मदत करणाऱ्या दोषीवर कार्यवाही करा अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी सर्व विधानसभेच्या अधिकाऱ्यांना या याद्यांमधील दुबार नावांची वोटर आयडी नंबर तपासून प्रत्यक्ष जागेवर ती व्यक्ती तिथे राहते कि नाही याची शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या प्रक्रियेमधील दोन दिवसाचा कालावधी अधिक वाढवावा व आपली यंत्रणा सज्ज करा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
