रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत वैद्य सुविनय दामले यांचा सल्ला..
ठाणे, 13 आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, निरामय जीवन जगता येते, मात्र बदलत्या काळानुसार आरोग्यनीती बदलली आहे. काळाच्या ओघात अनेक घरगुती उपाय सांगणारा “आजीबाईचा बटवा” नष्ट झाला आहे. तेव्हा ही रुढी, परंपरा आपणच जपली पाहिजे. असा मौलिक सल्ला वैद्य सुविनय दामले यांनी दिला आहे.
ठाण्यातील सरस्वती क्रिडा संकुलाच्या पटांगणात सुरु असलेल्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत वैद्य सुविनय दामले यांनी ‘आजीबाईचा बटवा’ यावर श्रवणीय आणि उद्बोधक व्याख्यान दिले. यावेळी व्याख्यानमालेच्या सत्राच्या अध्यक्षा ज्योती भोजने, विद्याधर वैशंपायन, मकरंद मुळे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.आ. संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली गेली ३९ वर्षे ही व्याख्यानमाला अखंडीतपणे सुरू आहे.
वैद्य दामले यांनी पुढे बोलताना,अनेक आक्रमणे झाली तरी आयुर्वेद पुसला गेला नाही की, पुर्वीच्या रूढी परंपरा बदललेल्या नाहीत. आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्ही निरोगी, निरामय जीवन जगू शकता. पूर्वीचे आयुष्य पुन्हा मिळवायचे असेल तर धर्मपालन, गावपालन, अर्थपालन आणि मोक्षप्राप्ती इथुन सुरुवात करणे आवश्यक आहे. असे सांगुन त्यांनी, पंचमहाभुतांसह जठराग्नी अशा १३ अग्नीने हे शरीर बनलेले आहे. या अग्नीमध्ये कमीजास्तपणा निर्माण झाला की रोग होतो. त्यासाठी या अग्नींची पुर्नस्थापना करणे आयुर्वेद तज्ञांचे काम आहे. सुखकर असेल ते हितकारक असेलच असे नाही. जिवंत राहण्यासाठी औषधे लागतात हा भ्रम आहे. धर्म, परंपरा, कर्मकांड यात आरोग्य दडलेले असल्याचे सांगताना त्यांनी वैदिक हिंदु धर्माचे अनेक दाखले दिले. जेवण्यासाठी न जगता मोक्षप्राप्तीसाठी जगा. खाल्लेले पचन होण्यासाठी तसेच शरीरासाठी आपल्या संस्कृतीत प्रदक्षिणा, लोटांगण हेच योग्य व्यायाम आहेत, तेच प्रत्येकाने करण्याचा सल्ला त्यांनी दिला. जे देवासाठी ते देहासाठी ही संकल्पना फक्त भारतामध्येच आहे, तेव्हा हठयोगी बनले पाहीजे. पुर्वी अनेक घरगुती उपाय केले जात याचा उहापोह करताना दामले यांनी, आजी म्हणायची चुळ भरल्याशिवाय घरात प्रवेश नाही. दृष्ट काढणे, ओवाळणी करणे म्हणजे शक्तीने तेजाची उपासना होय, स्त्रीकडुन पुरुषाला ओवाळणे, अग्निहोत्र, यज्ञ केल्याने कार्बन पार्टीकल तयार होऊन परिसर स्वच्छ व पवित्र होतो. मात्र हे उपाय सांगणारा आजीबाईचा बटवा काळाच्या ओघात नष्ट होत आहे. आता तर आजीच वृद्धाश्रमात पोहचलीय, अशी खंत व्यक्त करून त्यांनी ही रुढी, परंपरा जपण्याचे आवाहन श्रोत्यांना केले. रात्रौ उशिरापर्यत चाललेल्या या व्याख्यानाचा समारोप कस्तुरी परांजपे हीच्या वंदे मातरम गीताने झाला.
