Saturday, March 7 2026 5:01 pm

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुधारणेबाबत लोकप्रतिनिधींच्या भावनांचा सकारात्मक विचार करणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, 11 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा उद्देश अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा निर्माण करणे हा आहे. लोकप्रतिनिधींनी भावनांचा सकारात्मक विचार करून या योजनेत सुधारणा करण्याबाबत विचार केला जाईल, असे कृषिमंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात सदस्य बाबासाहेब देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री अर्जुन खोतकर, सुभाष देशमुख, नितीन राऊत, संजय गायकवाड यांच्यासह सदस्यांनी सहभाग घेतला.

कृषि मंत्री कोकाटे यांनी सांगितले, ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत समाविष्ट घटकांचा लाभ देण्यात येतो. 1 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार सन 2024-2025 मध्ये या योजनेतर्गत घटकांचे आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये नगरपंचायत व महानगरपालिका क्षेत्राबाहेर असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी कोणत्याही विशिष्ट अंतराची अट नसल्याचेही कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी सांगितले.