राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलिसांना दिले निवेदन
ठाणे,05 – ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेत शिंदेंच्या साथिदारांना ‘बिनविरोध’ निवडुन येण्यास साह्य करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तिन्ही उमेदवारांसह संबधित पोलीसावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी शिवसेनेचे राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलीसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर पोलिसांनी निवडणुक आयोगाकडून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासित करण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनाही यासंदर्भात अवगत करून तातडीची कारवाई करण्याची विनंती केल्याचेही विचारे व जाधव यांनी सांगितले.
ठाणे महापालिका निवडणुकी दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग क्रमांक ५ ‘ब’ दादाभाऊ रेपाळे, प्रभाग क्रमांक १८ ‘ब’ च्या स्नेहा नांगरे आणि प्रभाग क्रमांक १८ ‘ड’ चे उमेदवार विक्रांत घाग ह्यांना पक्षातर्फे ‘एबी’ फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी घोषित केली होती. मात्र, तिघांनीही पक्षाला न कळविता परस्पर माघार घेत शिंदेच्या साथीदारांना बिनविरोध निवडून येण्यास मदत केली. ही बाब राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी गांभिर्याने घेतली आहे. या अनुषंगाने रविवारी श्रीनगर पोलीस ठाण्यात या तिघा उमेदवारांविरोधात सेना – मनसेने निवेदन सादर करून तिघांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटल्यानुसार, सत्ताधाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून तसेच, पैशांचे आमिष दाखवून या तिघांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असुन त्या पोलीसाने विक्रांत घाग या उमेदवाराला एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात नेले होते. या चित्रिकरणाचे पुरावे सोशल मिडिया तसेच सर्व प्रसार माध्यमांवरही झळकले आहेत. त्यामुळे, ही बाब गंभीर असुन एक प्रकारे पोलीस खात्यालाही लांच्छनास्पद आहे. किंबहुना, परस्पर माघार घेणाऱ्या उमेदवारांनी त्या – त्या प्रभागातील मतदारांशी केलेली ही प्रतारणा आहे. तेव्हा, सत्ताधारी व सरकारी यंत्रणांनी मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून लोकशाहीच संपुष्टात आणली आहे. त्यामुळे निवडणुक अधिकाऱ्यांशी संगनमत करून सत्ताधाऱ्यांनी केलेल्या या गैरप्रकाराबद्दल नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने संबधित पोलीसासह त्या तिन्ही उमेदवारांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा, अशा चुकीच्या पायंड्यामुळे लोकशाहीवरील विश्वास उडून नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होईल. असा इशारा राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
