Thursday, May 7 2026 1:19 am

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर कायम फेरीवाला मुक्त असलाच पाहिजे : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे 17 : ठाणे हे मध्यरेल्वेचे मध्यवर्ती स्थानक असून नव्याने विकसित होत असलेल्या ठाणे शहरात दिवसागणिक प्रवाशांची संख्या वाढत आहे. दररोज जवळपास 6 ते 7 लाख प्रवासी ठाणे स्थानकातून ये-जा करीत असतात. रेल्वेस्थानकातून बाहेर पडल्यानंतर इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांना सहज जाता यावे यासाठी हा रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. परंतु हा परिसर कायमस्वरुपी मोकळा राहिल यासाठी रेल्वेस्थानकापासून चारही बाजूला 150 मीटरच्या परिसरात फेरीवाला असता कामा नये अशा प्रकारे कारवाई करण्याचे निर्देश देत असतानाच महापालिका व वाहतूक पोलीसांच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्याबरोबरच फ्लायओव्हरील आवश्यक स्थापत्ये कामे करण्याच्या सूचना आज झालेल्या पाहणी दौऱ्यात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आज संपूर्ण ठाणे स्टेशन परिसराची पाहणी आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्‌त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता प्रशांत पाठक उपस्थित होते.

ठाणे स्थानकातून प्रवाशांना सहजपणे बाहेर पडता यावे यासाठी सदरचा परिसर 24 x 7 फेरीवाला मुक्त करण्यासाठी या ठिकाणी सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी, कर्मचारी व वर्दीतील पोलीस यांची नेमणूक करुन या परिसरात एकही फेरीवाला असणार नाहीत, स्थानकाच्या आवारात ज्या ठिकाणी बेघर व्यक्ती असतील त्यांना निवारा शेड येथे घेवून जावे, फेरीवाले व भिक्षेकरी बसणार नाहीत तसेच असामाजिक तत्वे जसे गर्दुल्ले यांचा वावर राहणार नाही या दृष्टीने तोंडदेखली कारवाई न करता नियमित कारवाई करण्याबरोबरच सहाय्यक आयुक्तांची नेमणूक ही रोटेशन पध्दतीने करण्याचे श्री. बांगर यांनी सूचित केले. नियमित कारवाई सुरू न राहिल्यास व फेरीवाल्याबाबत तक्रारी आल्यास नेमणूक केलेल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल असा इशाराही देत असताना नियमित कारवाईनेच या परिसरात बदल घडून येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाणे स्थानकाबाहेरील सॅटिसला जोडणारा पादचारी पूल व गोखले रोड वरुन स्टेशनकडे जाणाऱ्या पादचारी पुलाची पाहणी केली. सदर पुलाच्या दोन्ही बाजूस असलेले कठडे अस्वच्छ असल्याचे निदर्शनास येताच या पुलावर साफसफाईसाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले. सदरचा परिसर स्वच्छ राहिल यासाठी थुंकून विद्रुप झालेल्या कठड्यांची पाण्याने स्वच्छता करुन त्यावर रंग लावण्यात यावा, सुका कचरा, ओला कचरासाठी असलेल्या कुंड्यातील कचरा नियमित उचलला जाईल याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

बसची वाहतूक सुरू असलेल्या सॅटिस पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेले पेव्हर ब्लॉक काढून त्या ठिकाणी आवश्यक ती रस्त्याची डागडुजी करण्याच्या सूचना श्री. बांगर यांनी दिल्या. तसेच प्रवाशांसाठी सॅटिसपुलावर असलेले मोबाईल टॉयलेट हे बंद असल्याचा जाब विचारत त्या ठिकाणी तातडीने पाण्याची सोय उपलब्ध करुन सदरचे शौचालय सुरू करण्यात यावे.

*स्थानक परिसर व सॅटिस पुलावर सुशोभिकरण करावे*

ठाणे स्थानक परिसर हा सर्वाधिक वर्दळीचा परिसर असून प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरुन पश्चिमेकडे बाहेर पडताना प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी दिशादर्शक चिन्ह लावावी, तसेच सॅटिसवर चढण्यासाठी व उतरण्यासाठी असलेल्या जिन्यावर आकर्षक पध्दतीने रंगरंगोटी करुन सुशोभिकरणात भर पडेल या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. सॅटिसपुलावर असलेल्या मोकळ्या जागेत आदीवासी बांधवांची ओळख असलेल्या तारपा वाद्याच्या प्रतिकृतीची डागडुजी करावी, तसेच या ठिकाणी असलेल्या फरशांवर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने आकर्षक अशी रंगरंगोटी करण्याच्या सूचना आयुक्तांनी उपनगर अभियंत्याना दिल्या.

*पार्किंगबाबत नियोजन करावे*

ठाणे स्थानकाच्या बाहेर एस टी स्टॅण्डला लागून दुचाकी उभ्या असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी या परिसरातील पार्किंगचा आढावा देखील घेतला. गांवदेवी येथे स्मार्टसिटीअंतर्गत उभारण्यात आलेले भूमिगत वाहनतळ लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भाजी मंडई येथील वाहनतळ व नाईकवाडी येथील खाजगी वाहनतळाच्या हस्तांतरणाची कार्यवाही पुर्ण करुन ताब्यात घेण्याच्या सूचना त्यांनी शहर विकास विभागाला दिल्या.

*चौकातील वाहतूक नियोजन करणे*

अलोक हॉटेल समोरील असलेला रस्ता सद्यस्थ‍ितीत एकमार्गी आहे. परंतु या रस्त्यावर पादचारी नागरिक व रिक्षांची ये-जा असल्याने नागरिकांना चालणे त्रासाचे होते यासाठी वाहतूक विभागाशी चर्चा करुन एकाच मार्गावरुन रिक्षा ये-जा राहिल व पादचारी नागरिकांना संपूर्णपणे उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या. या माध्यमातून रेल्वेस्टेशन परिसरात अधिकृत पार्किंग सुविधा निर्माण झाल्यामुळे अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.