Friday, March 13 2026 6:47 pm

रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करण्यासाठी कामांना गती द्यावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 2 : रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करण्यासाठी मोबाईल टॉवर उभारण्याच्या कामांना गती देण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करण्याबाबत मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी रायगडचे अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, रोहाचे उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकम, उपवनसंरक्षक (ठाणे) अक्षय गजभिये, रोहाचे सहायक वनसंरक्षक विश्वजित जाधव, अलिबागच्या उपवनसंरक्षक गायत्री पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. बी. कदम आदी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यात पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा या तालुक्यातील संपर्कासाठी मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सोडविण्यासाठी मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या कामांसाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन तातडीने पूर्ण कराव्यात. कालबद्ध कार्यक्रम तयार करुन प्रशासनाने ही कामे गतीने करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केल्या. रायगड जिल्ह्यात आपत्कालीन स्थितीत टिकणारी अद्ययावत अशी यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.