Saturday, December 6 2025 12:00 pm

अन्न व औषध प्रशासन विभागाचा तक्रार क्रमांक तीन अंकी होणार

मुंबई, 13 : नागरिकांना भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे १८००-२२२-३६५ या विनामूल्य क्रमांकावर तक्रार करता येते. हा क्रमांक मोठा असल्याने तो नागरिकांच्या लक्षात राहत नाही आणि तक्रारीदेखील अत्यल्प येत असल्याचे निदर्शनास आले. हा क्रमांक बदलण्याच्या सूचना नागरिकांकडून आल्या आहेत. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी हा क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच हा क्रमांक तीन अंकी होणार आहे. तीन अंकी क्रमांक झाल्यावर नागरिकांना अन्न भेसळीविषयी तक्रार करणे सुलभ होणार आहे.