ठाणे, 7 ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. विजेत्या ग्रामपंचायतींना 60 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत असून सर्व ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावे असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक गावात स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. प्लास्टिक इतरत्र पसरणार नाही. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोनसाठी जिल्हा परिषदेने नियोजन केले असून, गावोगावी स्वच्छतेसंदर्भात स्पर्धा निर्माण व्हावी, म्हणून शासनातर्फे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. गावात सर्वच स्तरावर स्वच्छता राखा, स्पर्धेत सहभाग नोंदवून प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक मिळवा अन् लाखोंच्या बक्षिसाचे मानकरी व्हा, असा संदेशच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत ग्रामपंचायतींना दिला आहे अशी माहिती प्रकल्प संचालक जल जीवन मिशन विभागाचे प्रमुख श्री. पंडीत राठोड यांनी दिली.
कामाचे मूल्यमापन
1. शौचालय- गावात किती कुटुंबीयांकडे शौचालय आहे. नियमित वापर होत आहे की नाही, या अनुषंगाने मूल्यमापन होईल.
2. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन- गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कसे आहे, शोषखड्डे आहेत का?
3. प्लास्टिक कचरा – प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, घटागाडीची व्यवस्था आहे की नाही?
काय आहे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण)?
शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) राबविण्यात येते, स्वच्छतेसंदर्भात उत्कृष्ठ काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर बक्षिसे देऊन सम्मानित केले जाते.
60 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत बक्षिस
1.जिल्हा परिषद गटातील प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला ६० हजार रुपयांचे बक्षीस.
2.जिल्हास्तरावरील प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला सहा लाख रुपये, द्वितीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला चार लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला तीन लाख रुपये, विभागस्तरीय प्रथम क्रमांकाला 12 लाख, द्वितीय क्रमांकाला नऊ लाख व तृतीय क्रमांकाला सात लाख रुपये, राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 35 लाख रुपये, तृतीय क्रमांकाला 30 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.
ग्रामसेवक, गटविकास अधिकाऱ्यांनाही पुरस्कार
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनादेखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.