वाशी विभागाने एप्रिल २०२२ पासून १ कोटी १७ लाखाची वीजचोरी उघडकीस आणली
मुंबई 29 : महावितरण भांडूप परिमंडलात वीजचोरी पकडण्याची मोहीम सतत सुरु असते. वाशी मंडळातील अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता शामकांत बोरसे व त्यांच्या चमूने माहे एप्रिल २०२२ पासून ते आता पर्यंत वाशी विभागात १ कोटी १७ लाखाची वीजचोरी उघडकीस आणली आहे. याशिवाय अनधिकृतपणे विजेचा वापर करून ५१ लाख ७० हजार रुपयांचा महावितरणचा नुकसान झाला आहे.
महावितरण भांडूप परिमंडलात वीज चोरी पकडण्याची मोहीम सतत चालू असते. एप्रिल २०२२ ते आतापर्यंत महावितरणच्या वाशी मंडळातील ऐरोली, कोपरखैरणे व वाशी येथील ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. सदर तपासणीत, विविध ठिकाणी वीजचोरी तसेच विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे दिसून आले. विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार ३३५ प्रकरणात १ कोटी १७ लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे. या याशिवाय, विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार ७२ प्रकरणात ५१ लाख ७० हजार रुपयांचा अनधिकृतपणे विजेचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.
मुख्य अभियंता भांडूप परिमंडल सुनील काकडे यांनी वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना आवाहन केले की येत्या काळात सदरची मोहीम अती तीव्रतेने राबविण्यात येणार आहे म्हणून कोणीही वीज चोरी करून विद्युत कायद्याचे उल्लंघन करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल .