कोल्हापूर, १८ : आईवडील हे मुलांचे लग्न लावून देतात. मात्र, कोल्हापुरात एका तरुणाने आपल्या वडिलांच्या निधनानंतर आईचा पुनर्विवाह लाऊन देण्याचे क्रांतिकारक पाऊल उचलले.
कोल्हापुरातील युवराज शेले या तरुणाने हा धाडसी निर्णय घेतला. मागील दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमध्ये रत्ना शेले यांच्या सख्ख्या बहिणी आणि भावांचं एकूण अशा तब्बल सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर पतीचंही अपघाती निधन झालं. त्यामुळे हतबल झालेल्या रत्ना यांना सावरण्यासाठी मुलाने आईचा दुसरा विवाह करून देण्याचा चंग बांधला होता.
तसेच 12 जानेवारीला त्याचा तो निर्णय पूर्ण झाला. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी नगरीत हे क्रांतिकारक पाऊल पडले आणि त्याचे कौतुक सर्वत्र होऊ लागले. कष्टकरी तरूणानं, अनिष्ठ रूढींचं ओझं फेकून देत, एक वेगळा विचार कृतीत आणला. त्यातून खऱ्या अर्थानं माणुसकी, स्त्री सन्मान आणि भावनांचा आदर पहायला मिळाला.
करवीर तालुक्यातील शिंगणापूर मधील युवराज हा आई आणि वडिलांसोबत राहत होता. त्याचे वडिल नारायण शेले सेंट्रींग काम करत होते. मात्र, 26 जुलै 2022 ला त्यांना एका वाहनानं धडक दिली. यानंतर उपचार घेत असताना दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर युवराज आणि त्याच्या आईवर जणू आभाळ कोसळलं. त्याची आई तर या अपघातामुळं खचून गेली. एका खासगी रक्तपेढीमध्ये काम करून आणि सायंकाळच्या वेळीस नृत्य कलाकार म्हणून काम करत उदरनिर्वाह करणाऱ्या युवराजनं, स्वतःला सावरत आईला धीर दिला. मात्र, या दुःखातून युवराजची आई बाहेर येत नव्हती.
कुटुंब प्रमुखावर काळानं घातलेला घाला, आईचं वैधव्य, त्यातून घरात साचलेलं नैराश्य अशा गोष्टी युवराज अनुभवत होता. परवापर्यंत हसत खेळत काम करणारी त्याची आई अगदीच अबोल झाली होती. एकटी पडली होती. कुंकू नसलेलं कपाळ आणि बांगड्याविना सुने सुने दिसणारे आईचे हात युवराजच्या मनाला अगणित वेदना द्यायचे.
शेवटी खुप विचार करून, युवराजनं थेट आपल्या आईचा पुनर्विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आईच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा आणि वृध्दत्वामध्ये जोडीदाराची लागणारी गरज या गोष्टी पटवून देवून, युवराजनं आपली आई रत्ना यांना पुनर्विवाहासाठी अखेर तयार केलं. कोल्हापूरच्या तरुणाने घेतला हा धाडसी निर्णय ज्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला त्या समाज सुधारकांच्या कार्याला मिळालेली चालना देणारा ठरला आहे.