मुंबई, 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 299 उमेदवारांचे अर्ज पात्र असून त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने 204 उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघामध्ये दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील या आठ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय एकूण आठ जनरल निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक एकूण पाच आणि खर्च निरीक्षक एकूण 11 याप्रमाणे नियुक्त करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने 40 टक्के दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व 85 वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना 12-डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघात दि. 6 एप्रिलपर्यंत 85 वर्ष वयावरील 10 हजार 672 ज्येष्ठ नागरिकांचे तर 40 टक्के दिव्यांगत्व असलेले 3 हजार 555 दिव्यांग मतदारांचे त्याचप्रमाणे अत्यावशक सेवा या श्रेणीत 385 असे एकूण 14 हजार 612 अर्ज गृह मतदानासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील 2 आणि पुणे विभागातील 7 व औेरंगाबाद विभागातील 2 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये 12 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार असून 19 एपिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. नामनिर्देशन पत्र छाननी दि 20 एप्रिल रोजी होईल तर 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.