मुंबई, दि. ४ : वाचनाने माणूस अधिक सुसंस्कृत आणि समृद्ध होतो. प्रत्येकाने नॅशनल लायब्ररी येथे दोन दिवसीय सुरू असलेल्या या ग्रंथ महोत्सवाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केले.
दोन दिवस सुरू असणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन प्रेमी ग्रंथ प्रेमी आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे मुलुंड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी कळवले आहे. नॅशनल लायब्ररी वांद्रे पश्चिम येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगरतर्फे आयोजित ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ चे उद्घाटन मुंबई उपनगरचे आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते, मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रमोद महाडिक, कोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवे, राज्य ग्रंथालयाचे प्रशांत पाटील, ॲड. दीपक पडवळकर, मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड उपस्थित होते.
आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले, काळाच्या ओघात वाचनाच्या पद्धती बदललेल्या आहेत. मात्र नव्या पिढीला दोन दिवस येथे सुरू असलेल्या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या साहित्य संस्कृतीची माहिती मिळेल. ग्रंथ महोत्सवात विविध प्रकाशकांची पुस्तके देखील आहेत. शासनाच्या या उपक्रमाचा येथील सर्व ग्रंथ प्रेमी आणि नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीने महोत्सवाची सुरुवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला. मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. बनसोड यांनी प्रास्ताविक केले. तर कोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती साळवे यांनी आभार मानले.
ग्रंथ महोत्सव २०२३ मध्ये उद्या विविध परिसंवाद
दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ५ मार्च रोजी पहिल्या सत्रात ‘प्रकाशन व्यवसायातील आव्हाने’ या परिसंवादात डिम्पल प्रकाशनाचे अशोक मुळे, मॅजेस्टिक पब्लिशिंगचे अशोक कोठावळे, जयहिंद प्रकाशनचे हेमंत रायकर, ज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सहभाग असेल.
वाचन संस्कृती, सामाजिक बांधिलकी या विषयी चेतना महाविद्यालया तर्फे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. अवयव दान काळाची गरज हे पुरुषोत्तम पवार सादर करणार आहेत.
याशिवाय राकेश तळगावकर यांची संकल्पना असलेले मराठी साहित्यातील उत्तम व अभिजात पत्र साहित्यावर आधारित कार्यक्रमात श्रीनिवास नार्वेकर, अस्मिता पांडे राजश्री पोतदार, आशुतोष घोरपडे, समीर दळवी आणि विनीत मराठे यांचा सहभाग असणार आहे.
समारोपात वाचनाची आनंदयात्रा या कार्यक्रमाने होईल. यात ज्योती कपिले, विनम्र भाबल, तसेच महिला वाहतूक पोलीस कर्मचारी मेधा तामोरे आणि सुप्रिया रणधीर हे आपले मनोगत व्यक्त करतील. सोबत ग्रंथ प्रदर्शन व विक्री यांचे स्टॉल असणार आहेत. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम ग्रंथप्रेमी आणि वाचक प्रेमींसाठी विनामुल्य असणार आहेत.