अयोध्येतील धर्मगुरुंची प्रचार फेरीत प्रमुख उपस्थिती
शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
ठाणे, 08 – विरोधी पक्षातील उमेदवाराला धडकी बसेल अशी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार फेरी मंगळवारी सायंकाळी मीरा रोड आणि भाईंदर भागातून निघाली. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे हजारो कार्यकर्ते प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
अशोक सिंघल चौक येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. भगवे ध्वज, भगव्या टोप्या आणि प्रचार गाण्यांनी प्रचार फेरीत रंग भरला. मोटारसायकलस्वार मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये सहभागी झाले होते. शिवसेना, भाजपा आणि मित्र पक्षांचे झेंडे डौलाने फडकवत प्रचार फेरीस प्रारंभ झाला.
`एकही नारा, एकही नाम, जय श्री राम, जय श्री राम’, `अबकी बार, चारसो पार’चे नारे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देत अवघे आकाश दुमदुमले. चौकाचौकात महिला भगिनींनी उमेदवार नरेश म्हस्के यांचे औक्षण केले. अयोध्या येथून आलेले धर्मगुरु सुरेश ओझा आणि अभिरामाचार्य यांनी प्रचार फेरीत सहभागी होत फुलांची पुष्पवृष्टी नरेश म्हस्के यांच्यावर केली. नरेश म्हस्के यांनी धर्मगुरूंचे आशीर्वाद घेतले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, युवा सेनेचे पूर्वेश सरनाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, रवी व्यास, जिल्हाप्रमुख राजू भोईर, उत्तर भारतीय नेते विक्रम प्रतापसिंग, सचिन मांजरेकर, विजय राय, दरोगा पांडे, सुरेश खंडेलवाल, नयना वासानी, भगवती शर्मा, ध्रुवकिशोर पाटील, शरद पाटील यांच्यासह सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ महायुतीत मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला गेला आहे. मीरा, भाईंदर मधील भाजपाचे सर्व कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी नरेश म्हस्के यांना लोखोच्या लिडने विजयी करतील, असा विश्वास यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश आला असून त्यांच्या आदेशानुसार नरेश म्हस्के यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी मेहनत घेत असल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. उत्तन, वीर चिमाजी अप्पा उद्यान येथे प्रचार फेरीचा समारोप झाला.