ठाणे 3 :- ठाणे जिल्ह्यातील सर्व विभागांनी जलशक्ती अभियानांतर्गत उत्तम काम केले असून यापुढेही असेच काम सुरु ठेवावे, असे प्रशंसोद्गार राष्ट्रीय नीती आयोगाच्या सदस्या श्रीमती जागृती सिंघला यांनी आज येथे काढले.
केंद्रशासन पुरस्कृत जलशक्ती अभियान सन 2022-23 कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्याकरिता तसेच जलशक्ती अभियान व राष्ट्रीय जल मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी श्रीमती जागृती सिंघला या दोन दिवस ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज झालेल्या बैठकीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्रीमती सिंघला यांच्यासह उपस्थित असलेल्या केंद्रीय भूजल बोर्डच्या शास्त्रज्ञ तथा तांत्रिक अधिकारी श्रीमती वैष्णवी परिहार यांचेही स्वागत पुष्पगुच्छ देवून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रूपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती सिंघला म्हणाल्या, ठाणे जिल्ह्यात जलशक्ती या अभियानांतर्गत सर्व विभागांनी चांगले काम केल्याचे दिसून आले आहे. यापुढेही हे काम अधिक विस्ताराने अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे.
बैठकीच्या सुरुवातीस श्रीमती सिंघला यांचे स्वागत करुन जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्ह्यात झालेल्या जलसंधारण कामांची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सादर केली. याचबरोबर त्यांनी जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, वृक्षलागवड, सिंचन विहिरी, अमृत सरोवर योजनेची करण्यात आलेली कामे याविषयीची देखील माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिंदल यांनी या अभियानासंदर्भात करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांबाबत माहिती दिली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.दिपक कुटे यांनी जिल्ह्यातील कृषीविषयक कामे व नियोजनाची माहिती दिली. तर उपजिल्हाधिकारी श्री.दिपक चव्हाण यांनी जिल्ह्यात मनरेगा योजनेंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांविषयीची माहिती दिली तसेच शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानले.