Monday, May 12 2025 5:21 pm

उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या आजारांची नागरिकांनी काळजी घ्यावी- महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

उष्णता उपाययोजना कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या टास्क फॉर्सची झाली बैठक

ठाणे 05 : ठाणे शहर हे खाडी किनारी असल्याने मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यत वाढणाऱ्या आर्द्रतेमध्ये शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेत वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून चक्कर येऊन पडणे, स्नायूंना पेटके यणे, डोकेदुखी, श्चासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, झटके येणे याची माहिती द्यावी, नजीकचे आरोग्य केंद्र / रुग्णालयात त्याबाबत नोंद करणे तसेच उष्णतेच्या लाटेबाबत काळजी घेताना काय करावे व काय करु नये व उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराबाबत आशावर्कर्स यांना प्रशिक्षण देवून याबाबतची जनजागृती नागरिकांमध्ये करण्याचे निर्देश देत असतानाच नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन नुकत्याच झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.

ठाणे शहराचा उष्णता उपाययोजना कृती आराखडा तयार करण्यासाठी गठित केलेल्या टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक नुकतीच (मंगळवार 3 एप्रिल) महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संनियंत्रणाखाली झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल, उपायुक्त अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान आदी उपस्थित होते.

वाढत्या उष्णतेबाबत वागळे इस्टेट प्रभागात झोपडपट्टया व रहिवाशी संकुल येथे सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक, भौगोलिक सर्वेक्षण करण्यात आले होते. सदर बैठकीत सेंटर फॉर एन्व्हारमेंट एनर्जी ॲण्ड वॉटर या संस्थेने वागळे इस्टेट येथे केलेल्या सर्व्हेक्षणाबाबत, नागरिकांचे उषणतेच्या लाटेबाबतचे निरीक्षण व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. गेल्या काही वर्षामध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता व वारंवारिता वाढत असून रात्रीचे तापमान देखील वाढत आहे. त्याची झळ दैनंदिन कामकाज करताना समाजाच्या सर्व स्तरावर जाणवत आहे. वागळे इस्टेट प्रभागामध्ये अंदाजे 40% लोकसंख्या ही 15 वर्षाच्या खाली आणि 60 वर्षाच्या वरील वयाची असून त्यांच्यावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम जास्त तीव्रतेने जाणवत आहे. नजीकच्या आरोग्‌य केंद्रामध्ये बहुतांशी लोक उपचार घेतात तसेच आशा वर्कर्स नियमितपणे घरोघरी पाहणी करतात व औषध उपचार देत आहेत, परिसरात ठिकठिकाणी पाणपोईची संख्या वाढविणे, सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणे जसे बस स्टॅण्ड, रिक्षा स्टॅण्ड या ठिकाणी सावली वाढविणे अशा उपाययोजना नागरिकांनी सुचविल्या असल्याचे सदर बैठकीत नमूद करण्यात आले.

उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत रहिवासी संकुलांमध्ये माहिती पत्रके वाटणे, डिजीटल बोर्डवर सूचना प्रसिद्ध करणे, शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांना वेळोवळी पाणी पिण्यासाठी सूचना देणे यासारख्या बाबी समाविष्ट करणे तसेच आशा वर्कर्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबतचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी सदर बैठकीत संबंधितांना दिले. तसेच दर 15 दिवसांनी टास्क फोर्सची बैठक घेवून केलेल्या कामाचा आढावा घेण्याबाबतच्या सूचनाही यावेळी संबंधितांना देण्यात आल्या .