ठाणे महापालिका प्रशासनाचे आवाहन
*ठाणे (१५) :* ठाणे शहरात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस राहील, असा हवामान खात्याचा इशारा आहे. त्या पार्श्वभूमीवर, ठाणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने केले आहे.
*उष्माघात टाळण्यासाठी पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे : सर्वसामान्य नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी काय करावे :*
• तहान लागली नसली तरी सतत पाणी प्यावे.
• प्रवासात पाण्याची बाटली सोबत असावी. Oral Rehydration Solution (ORS) घ्यावे. जसे की, लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत इ. मिठाचे योग्य प्रमाण वापरावे.
• ऋतुमानानुसार उपलब्ध असणारी फळे व भाज्या यांचा आहारात उपयोग करावा.
*शरीर झाकलेले असावे -*
• कॉटनयुक्त सैलसर व सौम्य रंगांचे कपडे वापरावे.
• उन्हात घराबाहेर असताना टोपी अथवा छत्रीचा वापर करावा.
*सतर्क रहावे -*
• वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही इ. प्रसार माध्यमातून दिल्या जाणाऱ्या हवामानाबाबतच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
*शक्यतो घरात रहावे -*
• घरातील हवा थंड व खेळती रहावी.
• थेट सूर्यप्रकाशापासून घराचे संरक्षण करावे.
• घराबाहेर जाणे आवश्यक असल्यास सकाळी व सायंकाळच्या वेळेचा उपयोग करावा.
*जोखमीच्या व्यक्तींनी उष्माघात टाळण्यासाठी काय करावे -*
लहान मुले, गरोदर स्त्रिया, घराबाहेर काम करणारे नागरिक, मानसिक दृष्टया आजारी असलेली व्यक्ती, शारीरिक दृष्टया आजारी असलेले नागरिक, इतर प्रदेशातून आलेले नागरिक इ.घ्यावयाची काळजी :-
• वयस्कर, आजारी व्यक्ती यांनी घरात एकटे राहू नये.
• घरात थंडावा राखावा.
*हे करू नये -*
• दुपारी १२ ते ३ या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे.
• शारीरिक श्रमाची कामे करू नयेत.
• चपला/बुटाशिवाय घराबाहेर जाऊ नये.
• स्वयंपाक करीत असताना हवा पुरेशी खेळती राहील, याची काळजी घ्यावी.
• चहा, कॉफी, मद्य यांचे सेवन करू नये. साखरेचे अधिक प्रमाण असलेली पेये घेऊ नयेत.
• हाय प्रोटीन आहार व शिळे अन्न खाऊ नये.
• लहान मुले व पाळीव जनावरे यांना पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये ठेऊ नये.
*उष्माघाताचे परिणाम -*
• शरीराचे तापमान वाढणे.
• अति उष्म्यामुळे अंगावर रॅश येणे, हातापायांना सुज येणे, मसल्स क्रॅम्प येणे, बेशुध्द पडणे, इत्यादी.
• उष्माघाताने आधीच असलेल्या आजाराची तीव्रता वाढते.
*ही लक्षणे आढळल्यास त्वरित काळजी घ्यावी, योग्य उपचार घ्यावेत.*
• चक्कर येणे, बेशुध्द होणे, मळमळ, उलटी, डोकेदुखी होणे.
• खूप तहान लागणे.
• लघवी अत्यंत पिवळी होणे.
• श्वासोच्छवास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे
*जर आपणाला किंवा आजूबाजूच्या कोणाला ही लक्षणे आढळल्यास खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे -*
• अशा व्यक्तीला ताबडतोब हवेशीर जागेत न्यावे.
• पाणी पिण्यास द्यावे.
• जर मसल क्रॅम्प आला तर वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञांना त्वरीत बोलवावे.
उष्माघातामुळे होणारी कोणतीही लक्षणे (ताप, ग्लानी, संभ्रमावस्था) आढळली तर, ताबडतोब महापालिकेच्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात किंवा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात संपर्क साधावा. तेथे त्वरित उपचार केले जातील.
*संपर्कासाठी :*
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा – (दूरध्वनी क्र. २५३४ ७७८५/८६/८७)