राजन विचारेचा विजय निश्चित आहे…
आम्ही खोक्याचे भुकेलो नाहीत.. आम्ही आशीर्वादाचे भुकेलो
महासभा एकनिष्ठेच्या जाहीर सभेत शिवसेना नेते विनायक राऊत यांची जोरदार टीका
ठाणे,11- आम्ही खोक्यांचे भुकेलेलो नाहीत तर आम्ही आशीर्वादाचे भुकेलेलो आहोत. आम्हाला आशीर्वाद पाहिजे मतदारांचे.. आम्हाला आशीर्वाद पाहिजे ‘मातोश्री’चे. लोकप्रतिनिधी पद जे आम्हाला मातोश्रीने प्राप्त करून दिलेले आहे. हे गद्दारांना काय कळणार. त्यामुळे आम्ही मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलो आहोत, असा जबदरस्त टोला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी ठाण्याच्या सभेत शिंदे गटाला लगावला. महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ कोपरी येथे महासभा एकनिष्ठेची या सभेचा आयोजन केला होता. यावेळी राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. तसेच राजन विचारे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेना फोडणार्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारला जाणार असून पुढची पिढीदेखील त्यांना माफ करणार नसल्याचे टीका राऊत यांनी केली. तसेच ही निवडणूक भारत मातेची आहे. ही निवडणूक संविधानाची आहे. ही निवडणूक घटनेची आहे. ही निवडणूक स्वातंत्र्याची असल्याचे राऊत यांनी सांगितले. दिल्लीमध्ये बसलेल्या हुकूमशाहीची राजवट मी आणि राजन विचारे संसदेत बसून पाहात आहोत. कशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून देश लुटत आहेत.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड,सुषमाताई अंधारे ,प्रियंका ताई जोशी, विक्रांत चव्हाण, सुहास देसाई, केदार दिघे ,वंदनाताई शिंदे ,मनोज शिंदे ,राजेंद्र राजे ,कृष्णकुमार कोळी, प्रदीप शिंदे ,संजय ब्रीद ,चंद्रकांत पवार, रेखा खोपकर, सुजाता घाग, समिधाताई मोहिते, ज्योती कोळी, दयानंद वाल्मीक, मोहन तिवारी ,विक्रम खामकर ,संतोष केणे उपस्थित होते.
खाल्ल्या ताटामध्ये घाण करणार्यांकडून निष्ठेची अपेक्षा नाही – राऊत
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंचा आम्हाला अभिमान आहे. एक सच्चा कार्यकर्ता, निस्वार्थ सेवा करणारा एक लोकप्रतिनिधी. एक निष्ठावंत कसा असला पाहिजे हे राजन विचारेंकडून शिकावं. ज्यांच्या हृदयात गद्दारी बिनलेली आहे, बेईमानी आहे, खाल्ल्या ताटामध्ये घाण करणार्यांकडून निष्ठेची अपेक्षा नाही, असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.
म्हस्केंना उमेदवारी म्हणजे मस्करी केल्यासारखेच – सुषमा अंधारे
शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कोपरी येथील जाहीरसभेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गद्दार गटावर तोफ डागली. म्हस्के यांना उमेदवारी म्हणजे महायुतीने सगळी मस्करी केल्यासारखेच, असा टोला अंधारे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांना आपल्या स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता येत नाही यातच सगळी नाचक्की असल्याचेही म्हणाले.
गद्दारीचा छाप ठाणेकरांच्या डोक्यावर बसला आहे – जितेंद्र आव्हाड
ज्या बाळासाहेबांनी छोट्यातल्या छोट्या माणसाला मोठा नेता केला. ज्या ठाण्यावर बाळासाहेबांनी मनापासून प्रेम केलं. ज्या ठाण्यावर बाळासाहेबांनी आपलं मानलं. त्याच बाळासाहेबांच्या मातोश्रीवर पहिला खड्डा ठाण्यातच खणला गेला. गद्दारीचा छाप ठाणेकरांच्या डोक्यावर बसला आहे तो लवकरच मिटवायचा असल्याचे यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
नरेश म्हस्केंनी दिलेला त्रास विसरू नका – विक्रांत चव्हाण
सर्वपक्षीय नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना माझं एकच सांगण आहे तुम्हाला नरेश म्हस्केंनी दिलेला त्रास विसरू नका. कोपरीसह ठाण्यातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकार्यांचे हाल नरेश म्हस्केंनी केले आहेत. भाजपच्या नगरसेवकांनाही माझं सांगणं आहे की आज ते तुमच्याकडे येत आहेत आणि खांद्यावर हात टाकतील. पण तुम्हाला सगळ्यांना दिलेला त्रास विसरू नका, असे जबदरस्त टीका काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली.